उपमुख्यमंत्री शिंदे-वनमंत्री नाईक यांच्या वादात शिवसेना नेते संजय राऊतांची उडी!
उपमुख्यमंत्री शिंदे-वनमंत्री नाईक यांच्या वादात शिवसेना नेते संजय राऊतांची उडी!
पुन्हा शिवसेनेत स्वगृही येण्याचे आवाहन
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक ह्या ठाणे जिल्ह्यातील दोन मातब्बर नेत्यांमधील राजकीय वाद महापालिका निवडणूकांपासून उफाळून आलेला वाद आता निवडणूका संपल्यानंतरही थांबण्याचे नाव घेतांना दिसत नाही. ठाण्याचे खा.नरेश म्हस्के यांनी रविवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी ना.गणेश नाईक यांच्यावर टिका करतांना, नाईकांना बाहेर कुणीही ओळखत नसल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील वाद उफाळून आलेला असतांनाच शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी आता शिंदे -नाईक यांच्या वादात उडी घेतली आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलतांना शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी, ना.गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द लढण्यासाठी पुन्हा शिवसेना पक्षात स्वगृही यावे असे आवाहन केले आहे. खा. संजय राऊत पुढे म्हणाले की, माझा गणेश नाईक यांना प्रेमाचा सल्ला आहे की, भारतीय जनता पक्षाबरोबर राहून तुम्हाला या प्रवृत्तीशी लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला छुपा पाठिंबा शेवटी फडणवीस आणि अमित शाह यांचा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजपबरोबर राहून तुमची ही लढाई ही टोकाला जाणार आहे. त्यामुळे गणेश नाईक यांनी शिवसेनेत स्वगृही यावे आणि या लढाईचे रणशिंग फुंकावे, विजय हा गणेश नाईकांचा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ज्या पध्दतीने उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव कॅबिनेटमधील एका मंत्र्यांवर पोरकटासारखे हल्ले करतात, त्यामुळे माझे गणेश नाईक यांना आव्हान आहे की, ही लढाई भाजपमध्ये राहून तुम्हाला कधीच लढता येणार नाही. तुम्ही स्वगृही मुळ प्रवाहात आले पाहिजे आणि तिथे ही लढाई सुरू केली पाहिजे. संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठिशी उभा आहे. भाजपबरोबर राहून तुम्हाला लढता येणार नाही. तुम्हाला आमदार- मंत्रीपद मिळेल, मात्र लढण्याचे बळ कधीच मिळणार नाही असेही राऊत यांनी नमूद केले.
