वनमंत्री गणेश नाईक यांचा उद्या वाशीत जनता दरबार
वाशी (प्रतिनिधी) - महापालिकांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक व इतर विविध स्वरूपांच्या घडामोडींमुळे राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्यावतीने आयोजित जनता दरबार गेल्या काही दिवसांपासून होवू शकला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा नामदार गणेश नाईक यांच्या जनता दरबार या उपक्रमास सुरुवात होत आहे. त्यानुसार गुरूवार दि.१२ फेब्रुवारी रोजी वाशीतील विष्णूदास भावे नाटयगृहात जनता दरबाराचे आयोजन सकाळी १०.३० वाजल्यापासून करण्यात आले आहे. या जनता दरबारात आपल्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दि.१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून टोकन देण्यास सुरुवात होणार आहे. जनता दरबारात येतांना नागरिकांनी आपली लेखी निवेदने तीन प्रतींमध्ये आणावेत असे आवाहन करण्यात आले आहे.
