Breaking News

लग्न समारंभासाठी नागपूरहून नवी मुंबईत आलेल्या तरूणाचा पामबीच मार्गावर अपघातात मृत्यू...

लग्न समारंभासाठी नागपूरहून नवी मुंबईत आलेल्या तरूणाचा पामबीच मार्गावर अपघातात मृत्यू...

नेरुळ (प्रतिनिधी)- नवी मुंबईचा क्लीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काल संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास एनआरआय सिग्रलच्या पुढे काही अंतरावर हा अपघात झाला. विपुल महेंद्र कंगाली असे या अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वार युवकाचे नाव असून तो नागपूरहून लग्नकार्यासाठी नवी मुंबईत आला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एकंदरीत या दुर्देवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, नवी मुंबईचा क्लीन नेकलेस म्हणून ओळख असलेल्या पामबीच मार्गाची ओळख आता मृत्यूचा सापळा म्हणून होऊ लागली असल्याचे स्पष्ट होत आहे.नवी मुंबईतील पामबीच मार्गावर वाहनधारकांसाठी ६० किमी प्रती तास अशी वेगाची मर्यादा ठेवलेली असताना, त्यानंतरही बेफिकीरीपणाचे दर्शन घडवत, काही वाहन चालक हे अती वेगवान वाहन चालवून आपल्यासह इतरांचा देखील जीव धोक्यात घालताना दिसून येत आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, विपुल महेंद्र कंगाली, राहणार नागपूर हा एका लग्नकार्यासाठी नवी मुंबईत आला होता. यावेळी विपुल कंगाली हा मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवत होता, त्यामुळे दुभाजकाच्या दगडाला कट लागल्याने त्याची दुचाकी स्लिप झाली आणि तो खाली पडला. यावेळी या अपघातात विपुल याच्या डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. विपुल याच्या दुचाकीचा वेग एवढा प्रचंड होता की, अपघात स्थळापासून त्याची दुचाकी जवळपास २० ते २५ फूट पर्यंत घासत गेली असल्याचं यावेळी प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं.


Most Popular News of this Week