ऐरोली पटनी रस्त्यावर खाजगी वाहनांचे बेकायदा पार्किंग!
अपघाती घटना होण्याची शक्यता वाढीस; कारवाईची मागणी
ऐरोली (प्रतिनिधी) - एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात वाहतुक कोंडीसह पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनली आहे. वाहन पार्क करण्यासाठी जागा नसली तरी चालेल...पण वाहन हवेच अशा स्वरूपाच्या वाढलेल्या मानवी इच्छा आकांक्षांमुळे दिवसेंदिवस वाहन खरेदीची संख्या वाढतांना दिसत आहे. परंतु त्या तुलनेत शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरातील अंतर्गत व प्रमुख रहदारीच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात बेकायदापणे वाहने उभी करण्याचे प्रकार होतांना दिसत आहे.
मुलूंड-ऐरोलली-ठाणे या शहरांना जोडणाऱ्या ऐरोलीतील पटनी रस्त्यावर तर सकाळ- संध्याकाळ खाजगी कंपन्या व इतर आस्थापनांची वाहने सर्रासपणे उभी राहत असल्याने मोठा निधी खर्च करून बनविण्यात आलेला हा रस्ता खाजगी वाहनांना आंदण दिला आहे का? असा सवाल जागरूक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ठाणे बेलापूर रस्त्याप्रमाणेच ऐरोलीतील पटनी मार्गावर अलिकडच्या काळात वाहनांची रहदारी मोठया प्रमाणात वाढली आहे. विशेषत: सकाळच्या सुमारास हा रस्ता वाहनांच्या गर्दीने फुललेला असतो. मात्र रस्त्यावर होणाऱ्या खाजगी वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होवून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या प्रकारामुळे अपघाती घटना होण्याची शक्यता वाढीस लागली आहे.
यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करतांना जागरूक नागरिकांनी सांगितले की, खासगी वाहने ही एक प्रकारची खासगी संपत्ती असते. तर सस्ते हे सार्वजनिक हितासाठी करदात्यांच्या पैशांतून उभारण्यात आलेली एक सुविधा आहे. मात्र कररुपातील पैशातून उभारण्यात येणाऱ्या रस्त्यांचा उपयोग खासगी वाहनांसाठी होत असल्याने त्यांच्याकडून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात असून, अशा खाजगी वाहनांकडून एकतर वाहन पार्किंगपोटी ठराविक शुल्क आकारण्याची तजबीज करावी, जेणेकरून यंत्रणेस महसुली उत्पन्न मिळेल अथवा हे शक्य नसल्यास ज्याप्रमाणे सर्वसामान्य नागरिकाने किंवा रिक्षाचालकाने रस्त्यावर वाहन उभे केल्यास वाहतूकीस अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पुढे करून वाहतूक पोलिसांकडून ज्या तगमगतेने कारवाई केली जाते, तशाच स्वरूपाची कारवाई अशा खाजगी वाहनांवर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
