वाहतूक कोंडी करणाऱ्या १५० वाहनांवर एपीएमसी वाहतूक पोलिसांची कारवाई
वाहतूक कोंडी करणाऱ्या १५० वाहनांवर एपीएमसी वाहतूक पोलिसांची कारवाई
तुर्भे (वार्ताहर) - शहरात वाहतूक कोंडी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या तब्बल १५० वाहनांवर विशेष मोहिमेअंतर्गत एपीएमसी वाहतुक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती एपीएमसी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांनी दिली. यावेळी प्रलंबित दंड असलेल्या वाहन चालकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एपीएमसी वाहतूक शाखेच्या परिसरामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच मार्केट येतात. त्यामुळे मार्केट परिसरात बाहेर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये- जा सुरु असते. मसाला मार्केट ते माथाडी भवन पर्यंत तसेच माथाडी भवन ते अगदी फळ मार्केटपर्यंत रिक्षा चालक तसेच अन्य वाहने अयोग्य प्रकारे रस्त्यांवर वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडी होत होती. दोन मिनिटांचा रस्ता पार करायला अनेकदा पाच ते सात मिनिटे लागत होते. मार्केटमध्ये जाणारी वाहने तसेच मार्केटमधून बाहेर पडणारे वाहने यांना या वाहतूक कोंडीच्या सामना करावा लागत होता. याप्रकरणी घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने भाजीपाला मार्केट समोर सकाळी रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी होत होती, अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारींची नोंद घेत सदर ठिकाणी नियमित कारवाई केल्याने वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.यानिमित्त व्यापारी वर्गाकडून पोलीस निरीक्षक शिवाजी भांडवलकर यांचा सन्मान केला. यावेळी जमलेल्या लोकांचे वाहतूक नियमांबद्दल प्रबोधन करण्यात आले.
